Sankashti Chaturthi 2025 : श्री गणेशाला एकदंत नाव कसे पडले? जाणून घ्या त्यामागील दंतकथा

दात तुटल्यानंतर गणेशाला 'एकदंत' या नावाने ओळखले जाऊ लागले.

हिंदू धर्मानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरूवात केली जाते, तेव्हा प्रथम भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला येणारी चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित असते. या दिवशी उपवास आणि पूजा करून भक्त गणेशाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. संकष्टी चतुर्थीला, भक्त उपवास करतात आणि रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडतात. भक्त गणपती बाप्पाला गजानन, विघ्नहर्ता, गणपती, एकदंत, सिद्धीविनायक, गणेशा आणि गौरी पुत्र या नावांनी संबोधतात. मात्र आपल्याला माहितीये का की, भगवान गणेशाच्या या वेगवेगळ्या नावांमागे कथा काय आहेत ते. आज जाणून घेऊया एकदंत नावामागे काय आहे कथा…

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे, जो विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. या दिवशी, भक्त भगवान गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्यासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी, ज्याचा अर्थ ‘संकट दूर करणारी चतुर्थी’ असा आहे, गणेशाला समर्पित आहे. या दिवशी, स्त्रिया विशेषत: आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. 

पौराणिक कथा

एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्री रामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की, कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूलही दिलं होतं.

जेव्हा भगवान परशुराम कैलाश पर्वतावर पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच नाहीयेत. फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे. ते आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते. मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला. जिथं भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्री राम कथा ऐकवत होते. जेव्हा गणेशानं भगवान शंकराचा त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले.

त्यांनी गणेशाला आपला रस्त्या अडवू नकोस असं सांगितलं. नाहीतर युद्ध करण्याची चेतावनी दिली. गणपती बाप्पा मागे हटणारे नव्हते आणि त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं. या युद्धात परशुरामांच्या कुऱ्हाडीचा वार गणेशाच्या दातावर झाला आणि त्यांचा दात तुटला. याच घटनेमुळे गणेशाला ‘एकदंत’ हे नाव मिळाले. नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं. तर अशाप्रकारे गणेशाला एकदंत नाव मिळालं.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News