Shri Ganesh Gita : श्री गणेश गीता अध्याय ४ पठणाचे फायदे आणि संपूर्ण अध्याय वाचा

अध्याय ४ च्या श्लोक १ नुसार, जो माणूस शीत-उष्ण, जन्म-मृत्यू यांसारख्या द्वंद्वांचा सामना करतो आणि त्याबद्दल द्वेष करत नाही, तसेच कशाचीही अपेक्षा करत नाही, तो माणूस बंधनापासून मुक्त होतो.

गणेश गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठण कर्मयोग आणि संन्यास यामधील फरकांबद्दलची शिकवण देते, ज्यामुळे मनुष्य सांसारिक द्वंद्वांमध्ये अडकून न पडता मोकळेपणाने जगू शकतो. या अध्यायात, कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्ही भिन्न मानले जातात, परंतु ज्ञानी माणूस योग्य मार्गाची निवड करतो. हा अध्याय अशा व्यक्तींना मार्गदर्शन करतो जे शीत-उष्ण, जन्म-मृत्यू यांसारख्या दुःखांना सामोरे जाताना समभाव ठेवतात आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करतात. 

गणेश गीता अध्याय ४ पठणाचे फायदे

शीत-उष्ण, जन्म-मृत्यू यांसारख्या द्वंद्वांचा द्वेष न करता, त्यापासून अलिप्त राहून सुखाने जगण्याचा मार्ग दिसतो. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोन्ही मार्गांची तुलना करून, यातून कोणता मार्ग आपल्यासाठी योग्य आहे याचे मार्गदर्शन मिळते. कोणतीही आकांक्षा न ठेवता, संन्याशाप्रमाणे शांत आणि समाधानी जीवन जगण्याची शिकवण मिळते, ज्यामुळे व्यक्ती बंधनांपासून मुक्त होते. हा अध्याय आपल्याला कर्म करण्याच्या योग्य मार्गाबद्दल मार्गदर्शन करतो. तसेच, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणे हेच खऱ्या मोक्षाकडे नेणारे आहे हे शिकवतो. 

गणेश गीता अध्याय ४

(गीति)
हे देवा आपण जें, त्यागावें नी स्वकर्म करण्यास ।
ऐसें दोनींविषयीं, सांगितलें तें मला कळायास ॥१॥
कळलें दोनींविषयीं, परंतु त्यांतिल सुयोग्यसें सांगें ।
श्रेयस्कर तें असुनी, निश्चितसें एक ठरवुनी वागें ॥२॥
देव म्हणे नृपनाथा, कर्मांचा त्याग आणि स्वीकार ।
मोक्षास साधनें हीं, योग्य परंतू करीन स्वीकार ॥३॥
जो भेदबुद्धिपासुन, होणारें दुःख सोशितो सारें ।
न करि द्वेष नि इच्छा, तो त्यागी सौख्य सर्वदा सारें ॥४॥
बंधापासुन होतो, तत्कालीं मुक्‍त मनुज हे राया ।
ऐकें पुढील गोष्टी, त्यापरि वागें सुबोध परिसे या ॥५॥
अल्पसमंजस आणिक, अज्ञानी त्याग आणि स्वीकार ।
मानिति फलेंहि त्यांचीं, अलग अशीं असति जाण साचार ॥६॥
असति समंजस मानव, दोनींतुन एक मानिती प्रमुख ।
वर्तति त्यापरि भूपा, मिळविति फल हें तसेंच हें देख ॥७॥
जें फल त्यागापासुन, मिळतें तें योग साधुनी मिळतें ।
योगास कर्मसंग्रह, म्हणती तो योग जाण तो त्यातें ॥८॥
कर्माच्या त्यागाला , ज्ञाते म्हणती न त्यास संन्यास ।
इच्छारहीत कर्मे, करितो त्यालाच वदति संन्यास ॥९॥
येणेंपरि वर्ते जो, तो होतो ब्रह्मरुपसा योगी ।
ज्ञात्यांचें हें आहे, सांगे मत तें सुभक्त तुजलागीं ॥१०॥
योगाविषयीं उत्सुक, आत्मा केला तदर्थ वश ज्यानें ।
चित्ताची शुद्धी नी, जिंकुन इंद्रियं समस्तही त्यानें ॥११॥
केलें कर्म तयानें, अलिप्त राहे करुन कर्मांसी ।
ज्ञाते तयास म्हणती, मीही म्हणतों तयास संन्यासी ॥१२॥
जे कर्म करुन आपण, केलें आहे असें न मानीती ।
मन आणिक इंद्रियें हीं, एकादश तीं स्वकर्म करिताती ॥१३॥
ऐसा जो वागे तो, भूपा समजें तयास तूं योगी ।
तो तत्त्वविदहि असतो, विशेष गुण-युक्तसा असे योगी ॥१४॥
इंद्रियकृत कर्माला, जो अर्पी तो करुन कर्मासी ।
नोहे लिप्त तयाला, ज्ञाते म्हणतात यास संन्यासी ॥१५॥
सूर्याचें बिंब जसें, दिसतें उदकामधेंच सर्वांसी ।
उदका लिप्त न होई, तैसा मिश्रित सुपुण्य अघ ऐसी ॥१६॥
केवळ योगी जन जे, इच्छा सोडून स्वबुद्धि शुद्ध अशी ।
धारण करुन ते हे, याच प्रकारें करुन कर्माशीं ॥१७॥
काया वाचा बुद्धी, कर्मेंद्रियं नी मनेंचि कर्मांसी ।
करिती योगीजन जे, कथितों भूपा तुला कळायासी ॥१८॥
जो योगहीन मानव, फलइच्छेनें करीतसे कर्म ।
तो कर्मबद्ध होतो, दुःखानें पावतो कथीं वर्म ॥१९॥
स्वमनें योगी त्यजुनी, सारीं कर्में सुखास तो मिळवी ।
उत्तम नगरीं राहून, अपुल्यापरि तो जनांसही शिकवी ॥२०॥
मीही कोणा ठायीं, कर्तृत्वादी क्रिया न निर्माण ।
संपर्क तया बीजा, केल्या गोष्टी कदापि न च जाण ॥२१॥
शक्‍तींच्या योगानें, घडती गोष्टी अशा सहाजीक ।
अवधान पुढें द्यावें, प्रियकर भक्‍ता सुबोध हा ऐक ॥२२॥
मी विभु आहें भूपा, कोणाच्याही शिवें न पुण्यास ।
तैसेंच पाप न शिवे, कथितों भक्‍ता तुला कळायास ॥२३॥
मोहानें मोहित ते, अज्ञानें मूढ होति मोहित वा ।
नसती समर्थ राया, समजाया वरिल बोध अह उणवा ॥२४॥
ज्याचें आत्म्यावरचें, विवेक करुनीच नष्ट अज्ञान ।
होतें असेंच त्याचें, सूर्यापरि तें विकासतें ज्ञान ॥२५॥
ज्यांची माझे ठायीं, निष्ठा असते सदैव चित्तांत ।
माझे ठायीं ज्ञानें, रत असती ते अजन्म होतात ॥२६॥
विज्ञान-युक्त ज्ञानी, पाहति गो गजादि श्वानास ।
तैसेच पाहती ते, द्विज चांडालहि समस्त जातींस ॥२७॥
ऐसे ज्ञानि महात्मे, मानावे वा तसेच पंडित ते ।
गणपति वदती भूपा, ऐकें पुढती सुजाण बोधातें ॥२८॥
दोषरहितसे असुनी, सर्वत्रहि ते समान जो बघत ।
मिळविति ब्रह्मास अशा, त्यांना हें विश्व सर्व वश होत ॥२९॥
ऐसा मानव साधी, जीवन्मुक्ती करुन वर्तन हें ।
त्यातें योगि म्हणावें, जाणें भूपा सुबोध वचनीं हें ॥३०॥
सम-बुद्धीचा असतो, जाणुन ब्रह्मास आश्रया करि जो ।
आवडती नावडती, प्राप्ती होतां समान मानी जो ॥३१॥
त्याची बुद्धि न पावे, हर्षातें वा तसेंच द्वेषातें ।
कथितों सुबोध तूंतें, ठेवुन चित्तांत वागणें सुमतें ॥३२॥
भूपति वरेण्य पुसतो, त्रैलोकीं बा तसेंच सुरलोकीं ।
काय असें सौख्यातें, सांगा देवा कृपा करा भाकी ॥३३॥
कारण आपण आहां, समस्त विद्या सुपूर्णशा ज्ञाते ।
यास्तव विनवीं देवा, प्रश्न करा उघडासा कळायातें ॥३४॥
गणपति म्हणे वरेण्या, असती जे स्वात्मठायिं आसक्‍त ।
तैसेच तुष्ट असती, मुदितहि असती सुखांत अनुरक्त ॥३५॥
त्यांचे सुखनाशातें, पावत नाहीं नृपा असें समजें ।
जें सुख विषयांमाजी, तात्कालिकसें परंतु नच समजे ॥३६॥
विषयांपासुन सौख्यें, होती तीं जनन नाशशीं युक्त ।
दुःखाकारण होती, यास्तव ज्ञाते न होति आसक्त ॥३७॥
कायेपासुन क्रोधा, दूर करी जो तयास जिंकाया ।
य‍त्‍न करी तो होतो, पात्र सुखा त्या चिरायु भोगाया ॥३८॥
निष्ठा हृदयीं झाली, ज्ञानानें जो प्रकाश हृदयांत ।
पाडी तसाच गेला, संशय ज्याचा विरुन हृदयांत ॥३९॥
जो सर्वां भूतांचें, हित करितो तो सदैव ब्रह्मपदा ।
मिळवी सत्वर जो त्या, म्हणणें ज्ञाता नृपाळ हेच सदा ॥४०॥
शम-दम-युक्त असूनी, कामादिक शत्रु जिंकले साही ।
आत्मज्ञानी शोभति, ब्रह्मपदीं ते सुयोग्यसे पाहीं ॥४१॥
सोडुन समस्त विषयां, असनावरि बैसुनी वरी नजर ।
लावुन बैसे त्याला, प्राणायामक सुनाम मान्यवर ॥४२॥
प्राणापाना यांचा, रोध असे त्यास नाम शास्त्रांत ।
ऋषि प्राणायाम असे, म्हणती त्यांचे प्रकार त्री असत ॥४३॥
उत्तम मध्यम लघु हे, प्राणायामा प्रकार ते तीन ।
बारावर्णी भेदां, लघु म्हणती योगशास्त्रिं ते निपुण ॥४४॥
चोविसवर्णी मध्यम, उत्तम आहेत वर्ण छत्तीस ।
ज्यांत अशा यामांसी, करिती ते पावतीच सिद्धीस ॥४५॥
सिंह व्याघ्र मतंगज, यांना करिती सुलीन मानव ते ।
प्राणापानां यांना, साध्य करावें तयापरी त्यातें ॥४६॥
जैसे सिंहादिक ते, वश केले कीं न पीडिती कवणा ।
प्राणायामें दोनी, अघ दाहुन रक्षिती तनु जाणा ॥४७॥
जैसें उपरी वरती, चढुनी जावें अनुक्रमें पाथें ।
तैसे वायुहि दोनी, वश करणें हें उचीतसें येथें ॥४८॥
पूरक रेचक कुंभक, करुनी वायू प्रमूखशा नाडीं ।
अभ्यासावें भूपा, तीनहि जाणुन घेइ त्या नाडीं ॥४९॥
प्राणापानें कळती, भूत भविष्यहि समस्त या गोष्टी ।
ऐसा ज्ञाता होतो, भूपा ऐकें प्रसिद्ध ये सृष्टीं ॥५०॥
द्वादशवर्णीं उत्तम, प्राणायामास योजिती योगी ।
एकागर दोन अशा, सिद्धिसी धारणा करित योगी ॥५१॥
साधे योग तयांना, म्हणुनी योगीश धारणा नित्य ।
अभ्यासतात यास्तव, ऐकें भूपा सुभक्तिनें योग्य ॥५२॥
योग असा साधुन तो, त्रिकाळ गोष्टी घटीतशा जाणें ।
त्रैलोक्य त्यांस वश तें, होतें हें योग साधुनी जाणे ॥५३॥
ऐसे योगी असती, जग सारें ब्रह्मरुप चित्तांत ।
मानिति सदैव भूपा, ऐकें त्यांची स्थिती करीं श्रूत ॥५४॥
संन्यास योग दोनी, समान देती फळें अशीं मनुजा ।
ऐकें पुढील बोधा, सांगतसें तूं सुभक्तसा ओजा ॥५५॥
त्रैलोक्याचा स्वामी, व्यापुन आहें तयास मी एक ।
कर्मांचें फल दाता, हितकर्ताही जगांत मी एक ॥५६॥
ऐसें जाणुन मजला, जो भजतो तो सदैव भूपा हे ।
तो मुक्‍तीला पावे, सांगतसें मी तुलाच गीता हें ॥५७॥
चौथा प्रसंग यासी, नाम असे वैधयोग संन्यास ।
झाला पूर्ण असे हा, गणपति सांगे सुभक्‍त भूपास ॥५८॥
नमुनी सज्जन यांना, कथिली रचुनी स्वकाव्य ही गीता ।
चौथा प्रसंग येथें, समाप्त झाला गणेशशी गीता ॥५९॥
मोरेश्वरचरणाला, रचुनी अर्पीं यथामती गीतें ।
मोरेश्वरसुत म्हणतो, मानुनि घ्यावीं यथारुची शीतें ॥६०॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News