मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 26 नोव्हेंबरला असणार आहे. चंपाषष्ठीचा उत्सव महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येतो.
तळी उचलण्याचे महत्व
चंपाषष्ठीला तळी उचलणे हे ‘मणी-मल्ल’ या राक्षसांच्या पराभवाचे प्रतीक आहे, ज्याचा खंडोबाने (मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला) वध केला होता. या विजयाच्या आनंदात तळी उचलली जाते, ज्यात विड्याची पाने, सुपारी, खोबरे आणि भंडारा घालून ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी विषम संख्येमध्ये (तीन, पाच किंवा सात) उचलली जातात. तळीसोबत भंडारा उधळला जातो, जे भक्ती आणि विजयाचे प्रतीक मानले जाते.

चंपाषष्ठीला नागदिव्यांचे महत्व
चंपाषष्ठीला नागदिव्यांचे महत्त्व आहे कारण ते घराच्या समृद्धी, सुख आणि शांततेसाठी केले जाते. हा विधी चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला केला जातो. या पूजेमध्ये बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात, ज्यांची संख्या घरातील लोकांच्या दुप्पट असते आणि देव मुटके यांच्यासह त्यांची पूजा केली जाते.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देव मुटके, पुरणाचे ५ दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवळावे. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)