Dharmendra Passed Away : बॉलिवूडच्या सुवर्णकाळात स्वतःची स्वतंत्र छाप सोडणारे आणि ‘हीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते प्रकृतीच्या विविध समस्यांशी सामना करत होते. अखेर 24 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांची जीवनयात्रा थांबली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांच्यासाठी अभिवादन करण्यात येत आहे. यास पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासाठी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाले राज ठाकरे? Dharmendra Passed Away
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं.

१९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.
जगातील साधा सरळ माणूस
करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन..
राज ठाकरे ।











