Sanjay Dutt : माझ्याकडे बंदूक नव्हती… तरी मला शिक्षा झाली; संजय दत्तने सांगितली तुरुंगातील 5 वर्षांमागची अनटोल्ड स्टोरी

Asavari Khedekar Burumbadkar

Sanjay Dutt : बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्त आपल्या अभिनयातून जितका लोकप्रिय झाला, तितकाच त्याच्या आयुष्यातील वादग्रस्त प्रसंगांमुळेही तो सतत चर्चेत राहिला आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आणि त्यानंतर त्याने पाच वर्षांची शिक्षा भोगली. या काळातल्या संघर्षाविषयी संजय दत्तने नुकताच मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला संजय दत्त ? Sanjay Dutt 

‘द हिमांशू मेहता शो’मध्ये सहभागी होताना संजय दत्तने तुरुंगातील त्याच्या दिवसांची कहाणी सांगितली. तो म्हणाला की, त्याच्या कुटुंबाला सातत्यानं धमक्या मिळत होत्या. लोक त्याच्याकडे बंदूक असल्याची चर्चा करत होते; मात्र संजय दत्तच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. तो म्हणाला, “मला आजही समजत नाही की नेमकं काय घडलं आणि मी तुरुंगात कसा पोहोचलो. २५ वर्षांनंतर सिद्ध झालं की मी TADA किंवा बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी नाही. पण माझ्याकडे बंदूक नसतानाही मला शिक्षा झाली. या निष्कर्षाला यायला इतका वेळ का लागला, हे आजही मला समजलेलं नाही.”

तुरुंगात संजयने काय केलं

संजय दत्तने सांगितलं की तुरुंगातील जीवनाकडे त्याने शिक्षेसारखे न पाहता जीवनातील एक टप्पा म्हणून पाहिलं. त्या काळात त्याने कायद्याची पुस्तकं वाचली. शिवपुराण, गणेशपुराण, भगवद्गीता, रामायण आणि महाभारत अशी अनेक ग्रंथ त्याने अभ्यासले. प्रार्थना, ध्यान आणि जप यातून त्याला मानसिक बळ मिळाल्याचंही त्याने सांगितलं. त्याची एकमेव विनंती होती की खटला लवकरात लवकर निकाली निघावा, कारण त्याने अनेक कैद्यांना वर्षानुवर्षे निर्णयाच्या प्रतीक्षेत अडकून राहिलेलं पाहिलं होतं. Sanjay Dutt

यापूर्वी ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्येही संजय दत्तने तुरुंगातील अनुभवांवर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की तिथे तो काम करून पैसे कमवत असे. कधी खुर्च्या बनवणे, कधी कागदी पिशव्या तयार करणे यांसारखी कामं तो करत असे. याशिवाय त्याने तुरुंगात एक छोटं रेडिओ स्टेशनही सुरू केलं होतं. त्या स्टेशनवर चर्चा, विनोद आणि वादविवाद असे कार्यक्रम सादर केले जात. तीन-चार कैदी त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहित असत.

संजय दत्तच्या या उघडकीनंतर पुन्हा एकदा स्पष्ट होतं की त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांनी त्याला अधिक मजबूत बनवलं. चमकदार जीवनामागे दडलेला संघर्ष आणि जिद्दीची ही कहाणी प्रेक्षकांना नव्यानं विचार करायला भाग पाडणारी आहे.

ताज्या बातम्या