मुंबईतील वातावरणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. मुंबईला कधीकाळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात होते. तरी २०२५ या संपूर्ण वर्षात हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या संपूर्ण परिस्थितीतमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
मुंबईतील हवा प्रदुषणामुळे चिंता वाढली !
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने धुक्यासारखी दिसणारी ही प्रदूषणाची चादर शहरावर पसरली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महानगरपालिकेकडून 50 पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याच्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत. आजपासून म्हणजेच 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवण्यात येणार आहे. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे भाग या सर्वांची विशेष स्वच्छता करण्यात येईल.

मुंबईतील पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात सुरू असलेली कामे देखील प्रदूषण वाढवू नयेत यासाठी कसून नजर ठेवली जाणार आहे. अनेक ठिकाणी ‘एअर क्वालिटी मॉनिटरिंग युनिट्स’ बसवले जात आहेत, जेणेकरून हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सतत तपासता येईल आणि मानवी आरोग्यास कोणताही धोका होऊ नये याची काळजी घेता येईल. मुंबईच्या श्वासांचे रक्षण करण्यासाठी महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.
हवा प्रदुषण नियंत्रित करण्याची गरज
मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईकरांनी देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दक्षिणेतील शहरांत हवा समाधानकारक
दक्षिण भारतातील चेन्नई आणि पुद्दुचेरीतील निवासी भागांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या हवा अधिक स्वच्छ आढळून आली आहे. विजयवाडा आणि कोलकात्यामध्ये काही ठिकाणी प्रदूषण असले तरी, ते मुंबईतील देवनारसारख्या भागांइतके सातत्यपूर्ण आणि गंभीर नाही, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. थोडक्यात काय तर दक्षिण भारतातील बहुतांश शहरांतील हवेची गुणवत्ता अद्याप समाधानकारक आहे, हेच यावरून स्पष्ट होते.











